दुचाकी स्वाराला वाचवताना दोन्ही वाहने खड्ड्यात पलटी,सुदैवाने जीवितहानी टळली
सुनील भंडारे पाटील
वाडेबोल्हाई(ता. हवेली) येथे वाघोली-राहू रस्त्यावर वाडेफाटा नजीक रविवारी सकाळी ९:३० च्या सुमारास एसटी बस आणि एका चारचाकी कारचा भीषण अपघात झाला.
एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही,त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
अपघाताचे नेमके कारण असे की,शिवाजीनगर(पुणे) येथून दौंड तालुक्यातील वाळकी गावाकडे जाणारी एसटी बस (एम.एच.०६, एस.८३४३) आणि पिंपरी चिंचवडहून शिरूर तालुक्यातील नागरगावकडे जाणारी चारचाकी कार (एम.एच.१२, एन.पी.७७४०) ही दोन्ही वाहने वाडेबोल्हाई येथील वाडेफाट्या जवळ एकाच दिशेने जात होती.
कार एसटीला ओव्हरटेक करत असताना समोरून अचानक एक दुचाकी आली.त्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कार महिला चालकाचे नियंत्रण सुटले.
कार एसटीच्या बंपरला अडकून दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पलटी झाली.अशी माहिती वाडेबोल्हाईचे वायरमन अमोल पायगुडे,युवा नेते राहुल शिंदे,वाडेबोल्हाईचे माजी आदर्श सरपंच दिपक कुशाभाऊ गावडे यांनी दिली.
प्रवाशी सुखरूप;वेळप्रसंगी ग्रामस्थांनी केली मोलाची मदत
या अपघातात एसटी बसमधील असलेले अनेक प्रवासी सुखरूप बचावले.कारमधील महिला चालक आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलाही थोडक्यात बचावल्या असून,
काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.अपघातानंतर तातडीने वाडेबोल्हाई येथील स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली.युवा नेते राहुल शिंदे,वायरमन आमोल पायगुडे,योगेश पायगुडे,संतोष शितोळे,राजु पायगुडे,माऊली पायगुडे,यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी एसटीतील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी मोलाची मदत केली.असे वायरमन अमोल पायगुडे यांनी सांगितले.
वाघोली-राहू रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे:किर्ती अमोल पायगुडे मा.उपसरपंच तथा सदस्या
या अपघातामुळे वाघोली-राहू रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्या कीर्ती अमोल पायगुडे यांनी सांगितले की, पुणे,वाघोली-राहू,पारगाव हा रस्ता हवेली आणि दौंड या दोन तालुक्यांना जोडणारा एक महत्त्वाचा दळणवळणाचा रस्ता मार्ग आहे.
मात्र या रस्त्याची रुंदी कमी असल्यामुळे या ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात घडले आहेत.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि शासनाने या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करून नूतनीकरण करावे,अशी मागणी त्यांनी वाडेबोल्हाई ग्रामस्थांच्या वतीने केली आहे,