शिक्रापूर : प्रा. एन.बी. मुल्ला
तंत्रज्ञान हे मानवी कल्याणासाठी आहे परंतु त्याचा गैरवापर झाल्यास ते संपूर्ण निसर्गाला उध्वस्त करणारे ठरू शकते असे प्रतिपादन आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.
विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील श्री पांडुरंग विद्यामंदिरचे मुख्याध्यापक सुरेश गुलाब थोरात यांचा सेवापूर्ती स्नेहमेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोपटराव पवार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष निवृत्तीअण्णा गवारे होते.
यावेळी सुरेश थोरात यांना सेवापूर्ती निमित्त श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ व श्री पांडुरंग विद्यामंदिरच्या वतीने सपत्नीक संपूर्ण पोशाख, शाल, पुष्पगुच्छ, पांडुरंग रुक्मिणीची मूर्ती व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत विठ्ठलवाडी, मुख्याध्यापक संघ, विविध संस्थांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
यावेळी श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक काळुराम गवारी, लक्ष्मण गवारी, श्रीहरी गवारी, सरपंच शंकर धुळे, उपसरपंच ज्योती गवारी, मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ, माजी मुख्याध्यापक रामराव दौंडकर विनायक दरंदले, राजाराम नजन,अहमदनगर जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष रामचंद्र मांडगे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक संभाजी गवारे, माजी उपसरपंच सोपान गवारे, दिलीप गवारे, महेंद्र गवारे, योगेश थोरात, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके, शिक्षक संघटनेचे दादासाहेब गवारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना पोपटराव पवार पुढे म्हणाले की, अलीकडच्या काळात अति पाणी व खतांच्या वापरामुळे मातीचे आरोग्य धोक्यात आले आहे. भविष्यकाळात विद्यार्थ्यांना मातीचे आरोग्य शिकविण्याची गरज आहे. अमेरिका जगाला दिशा देणारा देश हा संपूर्ण जगात सर्वात जास्त अन्नाची नासाडी करणारा देश आहे. अमेरिकेत ४० टक्के अन्नाची नासाडी होत आहे.
तापमानाच्या बदलाचे दुष्परिणाम वेगाने आपल्या सर्वांच्या समोर येत आहेत. कोळसा संपतोय, नैसर्गिक गॅस संपणार आहे; हे असेच सुरु राहिल्यास भविष्यकाळात सूर्याचा प्रकाश सोडून ऊर्जेचे कुठलेच साधन उपलब्ध असणार नाही. नगर जिल्ह्यातील हिवरे बाजार येथे पुढच्या पंचवीस वर्षाचे संकट पाहून आजच गावाला सौर ऊर्जेच्या दृष्टीने स्वावलंबी कसे करता येईल हा प्रयत्न चालू असल्याचेही यावेळी हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांनी सांगितले.
मानपत्राचे वाचन प्रा.संदीप गवारे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ यांनी केले. प्रभाकर चांदगुडे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रवीणकुमार जगताप यांनी आभार मानले,