नागरिकांचे आरोग्य धोक्यात; मनपा आरोग्य प्रशासन निष्क्रिय
सुनील भंडारे पाटील
वाघोली (तालुका हवेली) परिसरात सध्या कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. वाढत्या लोकसंख्येसोबतच घरगुती आणि व्यावसायिक कचऱ्याचे प्रमाण प्रचंड वाढले असून, त्याचे योग्य व्यवस्थापन न झाल्यामुळे परिसरात दुर्गंधी, मच्छर व माशांचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कचरा गाड्या कमी असल्याचे कारण पुढे करून कचरा उचलला जात नसल्याने मनपा आरोग्य प्रशासनाचा ढिसाळपणा दिसून येत आहे.
वाघोलीतील स्थानिक रहिवाशांच्या मते, नियमित कचरा उचलण्याची व्यवस्था अपुरी असून, अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढिगारे रस्त्याच्या कडेला दिवसेंदिवस पडून राहतात. काही ठिकाणी तर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पेटवून दिला जात असल्यामुळे प्रदूषणाचा धोका वाढत आहे.
मनपा आरोग्य प्रशासनाची ढिसाळ भूमिका :
महापालिका विभागाकडून समस्या सोडवण्याचे प्रयत्न अपुरे व अप्रभावी ठरत आहेत. कचरा संकलनासाठी पुरेशी यंत्रणा, मनुष्यबळ आणि जागा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे केले जात आहे.
त्याबरोबर केसनंद रोड, आव्हाळवाडी रोड, आयव्ही रोड, बकोरी रोड, फुलमळा रोड, लोहगाव रस्ता आणि मुख्य नगर रस्त्यालगत गेली आठ दिवसांपासून कचरा साचून आहे. मनपा आरोग्य निरीक्षक संजय भुसारे यांचेकडे वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधींसह नागरिकांकडून कचरा उचलण्याची मागणी केली जात आहे.
परंतु गाड्या कमी असल्याचे कारण पुढे करून कचरा उचलला जात नसल्याने मनपा आरोग्य प्रशासनाची ढिसाळ भूमिका दिसून येते.
वेगाने वाढणाऱ्या वाघोलीसारख्या उपनगरात कचरा व्यवस्थापन ही एक गंभीर समस्या बनली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलणे अत्यावश्यक आहे. मनपा आरोग्य निरीक्षक संजय भुसारे यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.
प्रा. आ. केंद्रालगत कचऱ्याचा ढीग
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सीमा भिंतीलगतच पाणी साचले जवळच कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे मच्छर व माशांचा प्रचंड प्रादुर्भाव वाढला आहे.
वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज मोठ्यासंख्येने रुग्ण येत असतात. दरवर्षी पावसाळ्यामध्ये प्रथमिक आरोग्य केंद्रालगतच पाणी साचते. त्याच ठिकाणी नागरीक कचरा टाकत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
त्यामुळे प्रा.आ. केंद्रातील रुग्णांसह डॉक्टरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सर्वत्र वाढते कचऱ्याचे प्रमाण व साचलेली पाण्याची डबकी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
डासांचा प्रार्दुर्भाव वाढला असून जेष्ठ, लहानमुलांसह नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागणार आहे.
जे नागरिक कर भरतात त्यांना गाड्या कमी असल्याचे कारण पुढे करून कचरा उचलण्यास टाळाटाळ केली जात आहे. सार्वजनिक रस्ते, नोंदणीकृत सोसायट्यांमधील कचरा उचलण्याऐवजी खासगी व्यावसायिकांना विशेष प्राधान्य दिले जाते. ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपा आरोग्य प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येते.
- सातव पाटील (माजी अध्यक्ष, भाजप युवा मोर्चा, हवेली तालुका)
केसंनद रोडसह अन्य रस्त्यालगतचा कचरा उचलत आहोत. गाड्या सुद्धा कचरा उचलण्यासाठी येत आहेत. कुठेही कचरा साचणार नाही याची काळजी घेतली जाईल. वाघोली लगत असणाऱ्या केसनंद आव्हाळवाडी, बकोरी गावाचा कचरा टाकला जात असल्याने कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे.
- अजय थोरात (मुकादम)