खेड प्रतिनिधी
आज घरी परतत असताना एक दृश्य नजरेस पडले आणि क्षणभर मनात विचार आला. किती आर्थिक सामाजिक विषमता आहे, या देशात! ते दृश्य होते एका गरीब महिलेचे. एका गरीब कुटुंबातील महिला बाटल्या गोळा करून पोत्यांत भरत होती. क्षणभर मनात विचाराला आला. आपण त्या महिलेकडे जावे आणि तिची थोडी मुलाखत घ्यावी; म्हणून तिला मी प्रश्न विचारला.' मी तुमचा एक फोटो काढला तर चालेल का?' क्षणभर त्या शांत झाल्या.
त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मला बरेच काही सांगून गेले. मी त्यांना म्हणालो. ' काळजी करू नका आणि घाबरूही नका. मी फक्त तुम्हांला काही प्रश्न विचारतो. त्यांची उत्तरे दया.' नकारात्मक भूमिकेतूनच त्या 'हो' म्हणाल्या. मी त्यांना म्हणालो. 'मी तुमचं एक छायाचित्र काढले तर चालेल का? त्या नकारात्मक भावनेनेच 'हो' म्हणाल्या. 'मी तुम्हांला काही प्रश्न विचारले तर तुम्ही निराश, नाराज तर होणार नाहीत ना!' क्षणभर त्यांनी विचार करूनच मला होकार दिला. मी त्यांना म्हणालो, 'तुम्ही जे हे काम करता ते काम खूप उच्च आणि श्रेष्ठ दर्जाचे आहे. त्या आता माझ्याशी मोकळेपणाने बोलू लागल्या.
त्या म्हणाल्या, 'कसे काय?' मी म्हणालो, 'संत गाडगे महाराजांनी स्वतःच्या हातात झाडू घेतला आणि लोकांची घाण साफ केली. रात्री कीर्तनातून लोकांची मने स्वच्छ केली. त्यांच्या इतक्याच तुम्ही श्रेष्ठदर्जाच्या आहात! कारण स्वतःला उच्चभ्रू, उच्चवर्गीय, उच्चवर्णीय उच्चशिक्षित, सुशिक्षित आणि सुसंस्कृत समजणारे लोक जी घाण करतात ती स्वच्छ करण्याचे काम तुम्हीं करता. म्हणजे या देशाचे खरे सेवक आणि स्वच्छतादूत तर तुम्हींच आहात ना!' त्यांचा चेहरा आता थोडा खुलला. त्यांना मी पुढचा प्रश्न केला, ' तुम्हाला किती मुले आहेत?' त्यांनी सांगितले, 'तीन आहेत'. तुमचे पती काय करतात? त्या म्हणाल्या, 'त्यांचे निधन झाले आहे.' माझ्यावर तीन मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी आहे. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांनी फेकून दिलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या गोळा करते आणि त्या विकून येणाऱ्या पैशांतून मी माझ्या मुलांना खाऊपिऊ घालते. त्यांचा उदरनिर्वाह करते.' मला वाईट वाटले. मी म्हणालो, 'तुम्हीं इतर कोणत्याही व्यक्ती पेक्षा कमी नाहीत कारण खऱ्या अर्थाने तुमच्यासारखी अनेक माणसे या देशात आहेत. ती सुद्धा या देशाची, आपल्या भारतमातेची सेवाच करतात. तुम्हींसुद्धा स्वच्छतादूताचे काम मनापासून करीत आहात. या समाजातील उच्च-विभूषित आणि सुसंस्कृत लोकांनी केलेली घाण साफ आणि स्वच्छ करण्याचे काम तुम्हीं करीत आहात. खरंच तुम्ही नक्कीच खूप खूप श्रेष्ठ आहात.' त्या बिचाऱ्या भगिनीच्या चेहऱ्यावर समाधानाचे तेज झळकले. अशा स्वच्छता दूतांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सामाजिक संस्था, संघटना किंवा हे मायबाप सरकार पुढे येऊन लक्ष घालील काय? हाही एक प्रश्नच आहे?