शिक्रापूर : प्रा.एन.बी.मुल्ला
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने पौड रोड येथील मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात "भारताचे नवीन शैक्षणिक धोरण २०२० " या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न झाले.
चर्चासत्राचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव ए.एम.जाधव, सहसचिव एल.एम. पवार व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गंगाधर सातव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विजय खरे म्हणाले की जुनी शिक्षणपद्धती बदलून अभ्यासक्रमात लवचिकता आणणे ही आजच्या काळाची गरज होती. नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे पुढच्या पिढीसाठी बदलाच्या अनेक संधी देवू करणारे आहे. शिक्षकांनी बदलाची मानसिकता तयार केल्यास भारतीय शिक्षणक्षेत्रात महत्वपूर्ण बदल घडून येतील. त्यामुळे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आव्हानात्मक परंतु अनेक संधी निर्माण करणारे असेल असेल असेही त्यांनी सांगितले. या चर्चासत्रात विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटीचे प्रा.डॉ.बसवराज कुडाचीमठ, वैष्णव कॉलेज चेन्नई येथील विषयतज्ज्ञ डॉ.आर.शुभश्री, डॉ. शामला स्वामिनाथन ,न्यू आर्टस् कॉमर्स सायन्स महाविद्यालयाचे प्रा. डॉ.मंगेश वाघमारे तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक, अभ्यासक, संशोधक, विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी होते. २०२० चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आता २०२२ पासून लागू होत असून ते विद्यार्थी व सर्वसामान्यां पर्यंतही पोहोचायला हवे, या हेतूने या चर्चासत्राचे आयोजन केले असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गंगाधर सातव यांनी स्वागतपर मनोगतात सांगितले.
या राष्ट्रीय चर्चासत्रास पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या. चर्चासत्राच्या दुसऱ्या दिवशी कर्नाटक येथील प्रा.डॉ.श्रीनिवास पाटील यांनी " नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : संधी" या विषयाची मांडणी केली. कौशल्यधारीत शिक्षणाकडे लक्ष्य केंद्रीत करणे गरजेचे असून हे धोरण सर्वसमावेशक आहे. भारत या धोरणामुळे आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करू लागेल असे मत त्यांनी व्यक्त केले. मुंबई येथील डहाणूकर महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागप्रमुख डॉ. कांचन फुळमाली यांनी या धोरणाची पाच पायाभूत तत्वे सांगून ही शिक्षणपद्धती दर्जेदार व परवडणारी असेल असेही सांगितले. या सत्रात डॉ.डी.वाय. पाटील महाविद्यालयाच्या डॉ. मानसी कुर्तकोटी, मराठवाडा विद्यापीठाचे डॉ.दिलीप चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी शिरूरचे आमदार अशोक पवार, उद्योजक राम निंबाळकर, वाघिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके, बा.रा.घोलप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळकृष्ण झावरे, प्रा.डॉ.संगीता जगताप आदी उपस्थिती होते. या चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून निघोज (ता.पारनेर) येथील स्वामी समर्थ सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ.अशोकराव शेळके उपस्थीत होते. महाराष्ट्र अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकस् फेडरेशनवर संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल डॉ.शेळके यांचा सन्मान करण्यात आला. या चर्चासत्राचे संयोजन डॉ.सुनिता डाकले, डॉ.मेघना भोसले, उपप्राचार्य डॉ.शिवाजी शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सुनीता डाकले यांनी केले तर डॉ.सपना राणे व डॉ.श्रीनिवास इप्पलपल्ली यांनी सूत्रसंचालन केले.