सुनील भंडारे पाटील
जगाचा पोशिंदा समजल्या जाणाऱ्या शेतकऱ्याला कायम अडी अडचणींना सामोरे जावे लागत आहे, केंद्र शासन व राज्य शासन यांच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचे बाजार भाव मातीमोल झाले असून, कांद्याच्या मातीमोल भावा मुळे शेतकऱ्याच्या डोळ्याला पाणी आले आहे,
शेतमालाच्या अस्थिर बाजार भाव मुळे कष्टाने पिकवली जाणारी पिके शेतकऱ्यांना जीवन जगणे, मुलांचे पालन पोषण, शिक्षण करणे एवढे पैसे मिळत नसतील तर शेती करायची कशाला? असा गंभीर प्रश्न तयार झाला आहे, सद्यस्थितीत सर्वच शेतीमालांचे बाजारभाव ढासळलेले असून शेतकऱ्यांना कोणीच वाली नसल्याचे चित्र तयार झाली आहे, कांदा पिकवण्यासाठी चा कालावधी पाच महिने आहे, शिवाय त्यासाठी लागणारी बी बियाणे, रोपे, रासायनिक खते, इतर खते, औषध फवारणी, त्यासाठी लागणारे मजूर व इतर खर्च हे पूर्वीपेक्षा गगनाला भिडले आहेत, सद्यस्थितीत कांदा काढणी सर्वत्र चालू असून, 6 किंवा 7 रुपये किलोने कांदा व्यापारी उचलत आहेत, आता या रकमेत कांदा पिकविण्याचा खर्चही भागत नाही, मग शेतकऱ्यांनी जीवन जगायचे कसे,
जगाचा पोशिंदा समजल्या जाणाऱ्या शेतकऱ्याची शासनाकडून कायम हेळसांड होताना दिसत आहे, शासन शेतकऱ्याचा जीव गेल्यावर हमीभाव देणार का? असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांकडून वारंवार विचारला जात आहे,