पुणे : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं सत्ताधारी भाजपला जोरदार धक्का दिलाय. राज्यसभेच्या सहा जागांपैकी महाविकास आघाडीनं (Mahavikas Aghadi) तीन तर भाजपनं तीन जागांवर विजय मिळवलाय. खऱ्या अर्थानं सहाव्या जागेवर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. त्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला.
या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी आखलेली रणनिती यशस्वी ठरली. फडणवीसांनी एक एका मताची जुळणी केली. आजारी असलेले पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) आणि पुण्यातील कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक यांनाही फडणीसांनी विधान भवनात मतदानासाठी आणलं. तसंच या विजयाचं श्रेयही फडणवीस यांना या लढवय्या आमदारांनाच दिलं आहे. त्यानंतर आज नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक आमदार लक्ष्मण जगतापांच्या भेटीसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये गेले. तर खासदार डॉ. अनिल बोंडे आमदार मुक्ता टिळकांच्या भेटीला पोहोचले.
‘बहीण भावामध्ये जी चर्चा होते ती चर्चा आम्ही केली’
आमदार मुक्ता टिळक यांची भेट घेत अनिल बोंडे यांनी त्यांचे आभार मानले. तसंच त्यांच्याशी मनसोक्त गप्पाही मारल्या. मुक्ता टिळक यांची भेट घेतल्यानंतर बोंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुक्ताताई यांना भेटून आनंद झाला. स्वत:ची तब्येत ठीक नसताना त्यांनी आमच्या राज्यसभा निवडणुकीत योगदान दिलं. म्हणूनच आमच्या विजयाचं श्रेय मुक्ताताई टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना आम्ही दिलंय. आमचे लोकप्रतिनिधी अशी कर्तव्याची जाण ठेवतात. मी भेटून त्यांचे आभार मानले. बहीण भावामध्ये जी चर्चा होते ती चर्चा आम्ही केली. ताई लवकर बऱ्या व्हाव्या आणि त्यांनी समाजकारणात पुन्हा सक्रिय व्हावं अशी देवाकडे प्रार्थना करतो, असं बोंडे यावेळी म्हणाले.