शिरूर विशेष प्रतिनिधी
टाकळी हाजी ग्रामपंचायत निवडणुकी च्या पहिल्याच प्रचार सभेत दामुशेठ घोडे यांनी ही माझी निवडणूक नसून माझे लग्न आहे असे विधान केले होते. या विधानावर समोरच्या पॅनल कडून जोरदार टीका करण्यात आली होती. दि. ५ ऑगस्ट रोजी निवडणुकीच्या निकालानंतर मात्र घोडे यांनी लग्न सोहळा संपन्न करत अगदी लग्नातील सर्व विधी पार पाडून त्यांचा शब्द खरा करून दाखविला.
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील ४ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये दामुशेठ घोडे यांच्या दामुआण्णा घोडे प्रतिष्ठान- मळगंगा ग्रामविकास पॅनल ने १६-०१ असा दणदणीत विजय संपादन केला आहे.
यापूर्वी दामुशेठ घोडे यांनी त्यांच्या प्रभागामधून सलग पंधरा वर्ष बिनविरोध ची परंपरा राखली होती. परंतु या निवडणुकीत माजी आमदार पोपटराव गावडे यांच्याबरोबरचे राजकीय मतभेद ताणले गेले असल्याने त्यांना निवडणुकीला सामोरे जावे लागले. घोडे यांनी पण एकही जागा बिनविरोध होवू नये म्हणून सर्व सतरा जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले. काही जागांवर समोरच्या पॅनल कडून तगडे उमेदवार पाहून त्यांच्या विरोधात कुणीही लढायला तयार होत नसल्याचे पाहून सदर ठिकाणी दामूशेठ यांनी आपल्याच घरातील उमेदवार उभे केले.
प्रचाराच्या पहिल्याच सभेत दामुशेठ घोडे यांनी लोकांना भावनिक आवाहन करताना ही निवडणूक नसून हे माझे लग्न आहे , मी चार नंबर प्रभागाचा नवरदेव आहे , तर एक नंबर प्रभागमधून अरूनाताई माझी नवरी असून,दोन नंबर प्रभागातील त्यांची उभी असलेली सुनबाई ही आमची कलवरी आहे . तुम्ही सर्वजण माझे वरहाडी आहात. आणि निकाल म्हणजेच माझे लग्न असेल. अशा प्रकारे केलेल्या विधानावर ' बोलतो ते करतो आणि करतो तेच बोलतो ' हे सिध्द करत निकाल लागल्यानंतर टाकळी हाजी येथील कुंड पर्यटन स्थळ येथील मंगल कार्यालयात जावून एक अनोखा विवाह सोहळा संपन्न केला.यावेळी गावातीलच नव्हे तर बेट भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दिमाखदार सोहळ्याची सर्वत्र चर्चा होत असून चक्क या विवाह सोहळ्यास घोडे दाम्पत्याचे मुले, सूना,नातवंडे सुध्धा उपस्थित होते.