सुनील भंडारे पाटील
वाघोली(ता.हवेली) येथे पुणे - नगर महामार्गावर दिवसेंदिवस वाहतूककोंडी वाढत असून वाहतुकीची समस्या समोर येत आहे.या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक व प्रवासी वैतागले आहेत.ही समस्या लक्षात घेऊन वाघोलीतील पुणे - नगर महामार्गावर प्रत्येक चौकाचौकात ट्रॅफिक सिग्नल बसवावेत व प्रत्येक चौकांमध्ये ट्रॅफिक पोलीस नेमावेत अशा मागण्यांचे लेखी निवेदन पुणे पोलीस आयुक्त रितेश देशमुख यांना भाजप व्यापार आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य जयप्रकाश सातव पाटील यांच्या वतीने देण्यात आले आहे.
लेखी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,पुणे - नगर रस्त्यावर बकोरी फाटा,सोयरिक गार्डन मंगल कार्यालय येथे कायमस्वरूपी वाहतूक कोंडी होत आहे.नगर रस्ता रुंदी करणामध्ये बकोरी फाटा ते कटकेवाडी पर्यंत डीव्हायडर केल्याने सर्व वाहने बकोरी फाटा चौकामध्ये वळण्यासाठी येत आहे.तसेच या भागामध्ये छोटे मोठे गोडाऊन,बीजेएस कॉलेज,जीसपीएम कॉलेज,लेक्सिकन स्कूल,श्री रामचंद्र कॉलेज,संस्कृती स्कूल अशा शैक्षणिक संस्था व बकोरी रस्त्यावर साधारणतहा ३०० ते ४०० सोसायट्या आहेत.या सर्वांना याच चौकातून जावे लागत असल्याने फार मोठी वाहतूककोंडी होत आहे.सिग्नल नसल्याने कोणीही थांबत नाही,तर वाहतूक नियमांचे पालन करीत नाहीत.त्यामुळे कायमच येथे वाहनांची गर्दी होत आहे.सोयरिक गार्डन मंगल कार्यालय चौकतही हीच परिस्थिती आहे.
तसेच जुना जकात नाका ते कटकेवाडी पर्यंतच्या प्रत्येक चौकात कमीत कमी २ ट्रॅफिक पोलिस त्वरित नेमण्यात यावे.वाघोलीत वाहतूककोंडी मुळे अनेक अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.वाघोली येथील नागरिक व पुणे - नगरवर वाहनचालक या सततच्या वाहतूककोंडी मुळे त्रस्त झाले असून प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करून मोर्चे काढणार आहेत.
वाघोलीमधून जाणाऱ्या पुणे - नगर महामार्गासाठी तयार करण्यात आलेल्या बाह्यमार्ग वाघेश्र्वर मंदिर-भावडी रोड-लोणीकंद या मार्गे नगरला जाणारी वाहतूक चालू केल्यास मुख्य पुणे - नगर महामार्गावर रस्त्यावर वाहतुकीचा ताण फार कमी होईल.
त्यामुळे वाहतूककोंडी कमी होण्यासाठी वाघोलीत प्रत्येक चौकामध्ये ट्रॅफिक सिग्नल बसवून ट्रॅफिक पोलिस नेमावेत.अशी मागणी भाजप व्यापार आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य जयप्रकाश सातव पाटील यांनी पुणे पोलिस आयुक्त रितेश देशमुख यांच्याकडे केली आहे.