रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
माजी ग्रामविकास मंञी स्वर्गीय आर.आर.पाटील यांनी स्वच्छता अभियान व निर्मल ग्राम या संकल्पनांचा वापर करुन गावोगावी स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. व गावची स्वच्छता करुन गावाला एका आगळ्या वेगळ्या दिशेने घेऊन जाणाऱ्या संबंधित ग्रामपंचायतींना योग्य बक्षिस व सरपंचाना " आदर्श " सरपंच पुरस्कार देऊन गौरवण्यात येत असे. व असे आदर्श सरपंच तालुक्यात बोटावर मोजण्या इतके असायचे. कारण त्यांच्या कामातुन त्यांनी आदर्श निर्माण केलेला असायचा. व हा " आदर्श सरपंच पुरस्कार त्यांना गावाने किंवा शासनाने दिलेला असायचा माञ हल्ली पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील गावोगावच्या गल्लीबोळात व सोशल मिडियावरही ही " आदर्श सरपंच " नावाची जमात स्वतःला मिरवताना दिसायली लागली आहे.
पुर्वी सरपंच म्हटल की , झुपकेदार व पिळदार मिशा , धोतर , कुर्ता , पायतान , जाकीट , डोक्यावर टोपी अथवा पटका असा पेहराव असलेला भारदस्त व्यक्ती असायचा. राजकीय विरोध असला तरी गावातील सर्वजण त्या व्यक्तीला मान सन्मान व शब्दाला किंमत द्यायचे माञ काळ बदलला तस राजकारण देखील बदलल " धोतर नेसुन राजकारण करणारी जुनी पिढी वळचणीला गेली असुन पायजामा व पँन्टी घालणारी पिढी राजकारणाचा वारु हाकत आहे. यातच प्रत्येकाला सत्तेची लालसा निर्माण झाल्याने पाच वर्ष असलेले सरपंच पद हे एक एक वर्षासाठी वाटून घेऊ लागले व राजकारणातील सरपंच पदाचा दबदबाच कमी झाला. एखादी महिला सरपंच झाली की , तिचा पतीच नथीतुन तीर मारण्यासाठी सज्ज असतो. अशा ही महिला सरपंचाना " आदर्श सरपंच " पुरस्कार देण्यात आले आहेत. ज्यांना साधी स्वतः ची सही ही येत नाही.
त्यातच सध्याचे ग्रामपंचायतचे पदाधिकारी हे कोणत्या तरी राजकीय पक्षाचे पदाधिकारी असतात. त्याच बरोबर यातील बहुतांशी सरपंच हे जमिन खरेदी- विक्री व्यवसायात किंवा अन्य काही तरी व्यवसाय करतात व त्यात त्यांनी कोणाची तरी अर्थिक फसवणूक केलेली असते.
त्यांच्या हातात गुटख्याची पुडी किंवा दिवसा किंवा राञी दारुची बाटली असते. मग अशा एक ते दिड वर्षांचा कार्यकाळ लाभलेल्या पेताड सरपंचाना "आदर्श सरपंच " कोण म्हणणार?
हीच संधी ओळखून अहमदनगर जिल्ह्यातील एक ठग सध्या पुणे जिल्ह्यासह राज्यभरातील सरपंचाना आदर्श सरपंच पुरस्कार देत सुटला आहे. मागील काही महिन्यात भास्कर पेरे पाटील , निशिगंधा वाड या सारख्या दिग्गजांच्या उपस्थितीत हे पुरस्कार सोहळे अहमदनगर येथे पार पडले आहेत. संबंधित इसम हा मोठ्या मोठ्या राजकिय पुढाऱ्यां सोबतचे मंञालयातील स्वतःचे फोटो सरपंचाना दाखवून त्यांना भुलवत आहे. आता ह्या सरपंचाना मिळालेले हे " आदर्श सरपंच " पुरस्कार विकतचे का फुकटचे हे त्यांनाच ठाऊक. अशा स्वरूपाच्या चर्चा सध्या नागरिकांमध्ये चालू आहे,