सिडकोच्या ५ हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण

Bharari News
0
पुणे जिल्हा प्रतिनिधी
         नवी मुंबईतील सिडकोचे प्रकल्प गेम चेंजर ठरणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
 
ठाणे येथे दि. १५ रोजी महाराष्ट्राच्या ग्रोथ इंजिनमध्ये नवी मुंबईचे मोलाचे योगदान असून या भागात सिडकोच्या माध्यमातून उभे राहत असलेले मेट्रो, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आदी प्रकल्प ‘गेम चेंजर’ ठरणार आहेत, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. सिडकोच्या सुमारे ५ हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन झाले त्यावेळी ते बोलत होते. 
‘वर्षा’ निवासस्थान येथून मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सिडकोच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण केले. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा पूल, खारघर-तुर्भे जोड मार्ग, आणि उलवे किनारी मार्ग या प्रकल्पांचे भूमिपूजन त्याचप्रमाणे भूमिपुत्र भवन तसेच प्रवासी जलवाहतूक टर्मिनस नेरुळ या नागरी हिताच्या प्रकल्पाचे यावेळी लोकार्पण करण्यात आले. 

या कार्यक्रमास पालकमंत्री शंभूराज देसाई, क्रीडा व बंदरे मंत्री संजय बनसोडे, आमदार रमेश पाटील, गणेश नाईक, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, श्रीमती मंदा म्हात्रे, माजी खासदार संजीव नाईक, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 
नवी मुंबईमध्ये सिडकोच्या माध्यमातून उत्तम प्रकारे विकासकामे होत असून नवी मुंबईमध्ये उभी राहणारी विकास केंद्रे (ग्रोथ सेंटर) ही राज्याकरिता अश्वशक्ती आहे. महाराष्ट्र शासनाने अटल सेतू सारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिव्हिटी समृद्ध करण्यावर भर दिला आहे. शासनाच्या या उद्दिष्टाला हातभार लावून सिडकोनेही परिवहनाचे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत असे सांगून सध्या सुरु असलेल्या प्रकल्पांचे दर्जेदार काम करून या प्रकल्पांना गती देण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले. 

व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सिडकोच्या प्रकल्पांचे सादरीकरण केले. 

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पुलामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाकडे जाण्याकरिता व तेथून येण्याकरिता थेट प्रवेश मार्ग उपलब्ध होणार आहे. शिवाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासदेखील थेट जोडणी मिळणार आहे. 

 खारघर-तुर्भे जोड मार्ग हा 5.4 कि.मी. लांबीचा मार्ग असून या मार्गाद्वारे तुर्भे आणि खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क दरम्यान थेट कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे.  

उलवे येथील भूमिपुत्र भवन हे नवी मुंबईतील स्थानिक भूमिपुत्रांना त्यांच्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ म्हणून विकसित करण्यात आले आहे. या भवनाच्या माध्यमातून स्थानिकांना त्यांचे विविध सोहळे व कार्यक्रम साजरे करण्यासाठी हक्काची जागा प्राप्त होणार आहे.  

उलवे किनारी मार्ग हा अटल सेतू (एमटीएचएल) आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा सहा पदरी मार्ग विकसित करण्यात येत आहे.  

  नेरूळ येथे प्रवासी जलवाहतूक टर्मिनस विकसित करण्यात आले असून येथून नवी मुंबई ते दक्षिण मुंबई आणि कोकण या दरम्यान रो-रो आणि स्पीड बोट सेवा लवकरच सुरू होणार आहे.

 नेरूळ, नवी मुंबई येथून मुंबई (भाऊचा धक्का) Domestic Cruise Terminus (DCT) तसेच एलिफंटा गुंफा, मांडवा, रेवस इत्यादी ठिकाणी जलवाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे या प्रदेशांदरम्यान प्रवासाचे अंतर लक्षणीयरित्या कमी होणार आहे. तसेच पर्यटकांनाही या ठिकाणाला भेट देऊन रम्य सागरी प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!