पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासून या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातील तहसील कार्यालयांवर प्रचंड गर्दी झाली आहे. तसेच रोजच ही गर्दी वाढत असल्याने तहसील कार्यालयावर कामाचा प्रचंड लोड वाढला आहे.तसेच सर्व्हर डाऊन होण्याच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे दिवसभर रांगा लावून सुद्धा सर्व्हर डाऊन झाल्याने घरी जावं लागत असल्याने महिलांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मोलमजुरी सोडून या महिला तहसील कार्यालयात येत असल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता महिलांना तहसील कार्यालयात जाण्याची आणि रांगा लावण्याची गरज आता पडणार नाही.
राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबतची मोठी माहिती दिली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आता महिलांना अर्ज करण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आम्ही ही योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी आणि महिलांना होणारा त्रास कमी करण्यासाठी सातारा पॅटर्न राबवणार आहोत. या पॅटर्न नुसार आमची पथके घरोघरी जाणार आहेत. घरोघरी जाऊन शक्ती ॲपवर अर्ज भरून घेणार आहेत. त्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे महिलांना कुठे जावं लागणार नाही, कुठेही अर्ज करण्याची गरज पडणार नाही, असं शंभूराज देसाई म्हणाले. सोमवारपासून त्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.