सासवड प्रतिनिधी बापू मुळीक
महाराष्ट्रातील शेतकरी संकटात सापडला असून, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून अतिवृष्टीचा प्रश्न केंद्र व राज्य शासनाकडे मांडणार असल्याचे माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार शरद पवार यांनी परिचे (ता. पुरंदर) येथे शेतकरी संवाद कार्यक्रमात सांगितले. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या वेळी खा. सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप उपस्थित होते. कार्यक्रमात महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
शेतकरी संवाद कार्यक्रमात शेतीमालाला हमीभाव,पिनलवाडी पाणी योजना, पुरंदर विमानतळ, जेजुरी येथील रेल्वेचा प्रश्न, तरुणांना रोजगार आदी विषयांवर प्रश्न विचारले. त्या प्रश्नांना उत्तर देताना शरद पवार म्हणाले की केंद्रीय कृषिमंत्री असताना राबवलेल्या फळबाग योजनेमुळे कोकणातील तरुणांचे मुंबईला नोकरीसाठी स्थलांतरित होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. कांदा निर्यात या प्रश्नांवर बोलताना पवार म्हणाले की देशाचे कृषिमाल निर्यात धोरण वारंवार बदलत असल्याने इतर देशांना मागणीनुसार शेतीमाल पोहोचवणे शक्य होत नाही. शिंदे सरकारची भूविकास बँकेची कर्जमाफी घोषणा फसवी असून गेल्या दहा वर्षात एकाही शेतकऱ्याला या बँकेकडून कर्ज पुरवठा झाला नाही. गुंजवणीच्या पाण्यावर राजकारण न करता एका विचाराने योजना राबवल्या तर तालुक्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार असल्याचे सांगितले. पुरंदर मधून गेल्या वर्षी पाच लाख टन सोमेश्वर कारखान्यात गाळपासाठी गेला आहे.कारखान्याने शिक्षणात शिक्षण करापोटी पुरंदर मधील शेतकऱ्याकडून जमा केलेल्या रकमेतून पुरंदर तालुक्यातील मुलींच्या शिक्षणासाठी सुविधा पुरविल्या पाहिजेत असे पवार यावेळी बोलताना म्हणाले.
कार्यक्रमात आमदार संजय जगताप,जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर दुर्गाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी माणिकराव झेंडे,सुदाम इंगळे,पुरुषोत्तम जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे स्वागत पुष्कराज जाधव, प्रस्तावित हेमंत कुमार माहूरकर यांनी केले तर आभार माणिकराव झेंडे यांनी मांडले.