मुंबई प्रतिनिधी अनिल केळकर
वर्सोवा खाडीत साचलेल्या गाळामुळे मच्छिमार बांधवांनाच्या बोटी रुतून बसतात. अनेकदा त्यांचे अपघात होतात. त्यामुळे मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. यासंदर्भात वर्सोव्याच्या स्थानिक आ. डॉ. भारती लव्हेकर यांनी पाठपुरावा केला आहे.
२०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ कोटी १ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यामुळे १,२८,५८६ घनमीटर गाळ काढण्यात आला. गाळाचे प्रमाण अधिक असल्याने हा गाळ नियमित स्वरूपात काढण्यात यावा, अशी मागणी लव्हेकर यांनी केलेली होती.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी वर्सोवा मढ खाडीत साचलेला गाळ काढण्याविषयी लक्षवेधी लावली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना मत्स्यव्यवसाय, वने व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष बैठक लावण्याचे सभागृहात आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी नुकतीच बैठक घेतली. यावेळी आ. भारती लव्हेकर, माजी नगरसेवक योगिराज दाभाडकर, मेरिटाइम बोर्डाचे अधिकारी आदी उपस्थित होते. मुनगंटीवार यांनी सदर मागणीची दखल घेत गाळ काढण्यासंदर्भात आवश्यक निधी मंजूर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या वर्सोवा मढ खाडीतील साचलेला गाळ काढण्याबाबत सह्याद्री अतिथीगृहात मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच बैठक आयोजित केली होती. यावेळी वर्सोवा मढ येथे सागरी किनारी मच्छीमारांसाठी अद्ययावत सुसज्ज अशी जेट्टी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ३३६ कोटी रुपये एवढा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचे सादरीकरण दाखवण्यात आले. अद्ययावत जेट्टी वर्सोवा मढ येथे उभारण्यात यावी, अशी मागणी आ. भारती लव्हेकर यांनी केली होती.