सुनिल भंडारे पाटील
कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील भीमा नदीत रविवार (दि.२१) दुपारी दीडच्या सुमारास पोहण्यासाठी गेलेली दोन मुले पाण्यात बुडाली. गौरव गुरुलिंग स्वामी (वय १६), अनुराग विजय मांदळे (वय १६) अशी त्यांची नावे असून ही मुले कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील ढेरंगे वस्ती येथे राहण्यास होती.
रविवारी दुपारी पाच ते सात मुले भीमा नदीत पोहण्यास गेली,गौरव स्वामी हा शिकावू असल्याने खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचे संतुलन बिघडून तो बुडू लागल्याचे पाहत अनुराग मांदळे त्याच्या मदतीस गेला,मात्र गौरव घाबरल्याने त्याने अनुरागला आवळून धरले यामुळे दोघेही पाण्यात बुडले.या वेळी बाकीच्या मुलांनी आरडाओरडा केला असता शेजारील शेतकरी तानाजी ढेरंगे धावून आले सोबत स्वप्नील भोकरे, संपत भांडवलकर, बापू भांडवलकर, भाऊ अजगर, आदी ग्रामस्थांच्या मदतीने पाण्यात उतरून त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते सापडले नाही.
घटनेची माहीती मिळताच शिक्रापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलिस हवालदार मंगेश लांडगे,पोलिस शिपाई अमोल रासकर आदी पोहचले.दरम्यान पुणे महाविकास प्राधिकरण अग्निशमन दलाचे जवान तसेच रुग्णवाहिका दाखल झाल्या. दुपारी चारपासून अग्निशमन दलाचे जवान पाण्यात उतरले व शोधकार्य सुरू केले रात्री उशिरा पर्यंत त्यांचा शोध लागला नाही.या वेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती तर ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त केली जात होती.सोमवार सकाळी (दि २२) अग्निशमन दलाच्या अथक प्रेयत्ना दरम्यान साडे दहाच्या सुमारास एक किमी अंतरावर नदी किनारी खडकाच्या शेजारी गौरव स्वामी याचा मृतदेह सापडला .तर अनुराग मांदळे याचा मृतदेह शोधण्यासाठी दुपार पर्यंत शरतीचे प्रयत्न सुरूच ठेवले असता शेवटी दुपारी २ च्या सुमारास अनुराग मांदळे यांचा मृतदेह पोहण्याच्या ठिकाणीच सापडला. या घटनेमुळे कोरेगाव भीमा परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे,