सरसंघचालक डॉ.भागवत माऊलींचे दर्शनास आळंदीत

Bharari News
0
आळंदी प्रतिनिधी
            प पू स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्त गीताभक्ती अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत कार्यक्रमास सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आळंदीत आले होते. यावेळी त्यांनी माऊलींचे संजीवनसमाधी दर्शन घेत मंदिरास भेट दिली.
            ४ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत आळंदीत अमृत महोत्सव साजरा होत आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आळंदी मध्ये आले होते. त्यांनी माऊली मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पूजा केली. आळंदी संस्थान तर्फे प्रमुख विश्वस्त ॲड राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजन नाथ यांच्या हस्ते सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा शाल ,श्रीफळ व माऊलींची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. प पू स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्त गीताभक्ती अमृत महोत्सवा निमित्ताने ग्रंथ शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. आळंदीतील वारकरी संप्रदायाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
            स्वामी गोविंददेव गिरिजी यांचा महाराष्ट्राला अभिमान - भास्करगिरि महाराजगीताभक्ति अमृत महोत्सव; आळंदी अंतःकरणाचा केंद्र असल्याचे गोविंदगिरिजींचे भावोद्गार आज प्रत्येक तरुणाला मंत्री, साहेब व्हावंस वाटते. पण, वैदीक परंपरेचे ज्ञान आणि संतत्व ही फार भाग्याची गोष्ट असते. हि परंपरा टिकवणं हिच भारतमातेची सेवा आहे. आपल्या रुढी व परंपरा जोपासतांना आपण मागे रहाता कामा नये आणि आकाशाला हात लावतानाही कमी पडता कामा नये. हा सगळा विचार स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज यांनी केला आहे. कधी किशोर असलेले स्वामीजी आज गोविंददेव गिरिजी म्हणजे शिखराएवढे उंच झाले आहेत. आपल्या कर्मातून त्यांनी त्देवत्त्व प्राप्त केले असून महाराष्ट्राला स्वामी गोविंददेव गिरिजी यांचा अभिमान असल्याचे भावोद्गार श्रीदत्त देवस्थानचे प्रमुख ह.भ.प.भास्करगिरि महाराज यांनी व्यक्त केले.
             राष्ट्रसंत, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित ‘गीताभक्ति अमृत महोत्सव’ कार्यक्रमात कीर्तनसेवा देतांना ते बोलत होते. यावेळी स्वामी गोविंददेवगिरीजी यांच्यासह अनेक संत व मान्यवरांची उपस्थिती होती.
          आपल्या कीर्तनात भास्करगिरिजी यांनी गोविंददेव गिरिजींच्या जीवनावर प्रकाश टाकताना पुणे व अहिल्यानगर जिल्ह्याला त्यांचा विशेष अभिमान असल्याचा उल्लेख केला. देशातील सर्व संत-महंत त्यांच्या संपर्कात राहुन संन्याशी, आखाडा आणि वारकरी परंपरा पुढे नेत आहेत. या कार्यक्रमामुळे देशभरातील साधु-संतांची व आलेल्या अतिथींची नाळ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींशी जोडली गेल्याचे महाराज म्हणाले. स्वामी गोविंददेव गिरिजी यांनी माऊलींच्या प्रेमाचा धागा कधीही सैल होवू दिला नाही. परदेशातही त्यांनी माऊलींचे मंदिर बांधले असल्याचे त्यांनी सांगितले.
           मंदिरं निर्माण करता येतील, दुधा-दह्याचे अभिषेकही घालता येतील, पण दीनदुबळ्यांना उभं करणारं मंदिर मात्र कोणालाही उभं करता येतं नाही. स्वामी गोविंददेव गिरिजी महाराजांनी मात्र हे कार्यही पूर्ण केल्याचे कृतार्थ भावही त्यांनी व्यक्त केले. स्वामीजींच्या कार्याचा सुवर्ण कलश म्हणजे अयोध्येतील श्रीराम मंदिर असल्याचे सांगत त्यांनी मंदिरासाठी झालेल्या पाचशे वर्षांच्या संघार्षावर प्रकाश टाकला. सहाव्या शतकांपासून आक्रमण झेलीत सोळाव्या शतकात संपूर्ण उध्वस्त झालेल्या राजा विक्रमादित्य निर्मित श्रीराम मंदिराच्या जागी आज पुन्हा भव्य आणि दिव्य मंदिर उभे राहीले. प्राणप्रतिष्ठेच्या दिव्य सोहळ्यातून अवघ्या जगाने प्र्रभु श्रीरामचंद्रांचे दर्शन घेतले. सुरुवातीपासूनच श्रीराम मंदिर आंदोलनाशी जोडलेल्या स्वामींच्या देखरेखीखाली उभे राहीलेले हे मंदिर देशाच्या संस्कृतीचे मंदिर असल्याचे गौरोद्गारही त्यांनी काढले.
            अयोध्येत उभं राहिलेलं श्रीरामांचे मंदिर भारतीय संस्काराचे मंदिर असून त्यातून शिकण्यासारखे खूप काही आहे. दीनदुबळ्यांच्या सेवेसाठी प्रभु श्रीरामाने राज्याचा त्याग केला हे रामचरित्र असून देशातील दीनदुबळा सुखाने कसा राहील याचा विचार म्हणजे रामायण असल्याचे त्यांनी सांगितले. दुसर्यासाठी आपल्या सुखाचा त्याग करणं हिच खरी श्रीरामाची पूजा असल्याचा भाव अयोध्येतील श्रीराम मंदिरातून मिळेल अशी आशा व्यक्त करताना आजच्या पिढीला हा स्वर्गीय सोहळा पाहण्याचे भाग्य मिळाले. आक्रमकांना देशातील मंदिरांची तोडफोड करता आली, मात्र भारतीयांची श्रद्धा मात्र त्यांना तोडता आली नाही. आज उभ्या राहिलेल्या भव्य श्रीराम मंदिरातून त्याचे प्रतिबिंब दिसल्याचे भावोद्गारही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
            स्वामी गोविंददेव गिरिजी यांनी भास्करगिरि महाराजांचे आभार मानताना आळंदी हे आपल्या अंतःकरणाचा केंद्र असल्याची भावना प्रकट केली. परंतु आज प्रभु कृपेने आपल्या जीवनाचा फूटबॉल झाल्याचे मिश्मिलपणे सांगत आज आळंदीत तर उद्या अयोध्येत असा आपला पवास सुरु असल्याचे ते म्हणाले. जीवनाचा हा प्रवास अशाच पद्धतीने चालत रहावा यापेक्षा मोठी भाग्याची गोष्ट नाही. एकीकडे आळंदी आणि दुसरीकडे अयोध्या हे समाधान तृप्तीचे शिखर आहे. या तृप्तीचा एक उत्सव स्नेहीजणांनी आयोजित केला आणि देशातील संत-महंत त्यात सहभागी झाले, सूर्यरुपी भास्कर महाराजांच्या कीर्तन सेवेतून आपल्या अमृतमहोत्सवी वर्षात प्रकाश पडल्याचा भाव व्यक्त करताना स्वामीजींच्या डोळ्यात कृतार्थतेची आसवंही दाटली होती.
           कोणी राहो न राहो, भारतवर्ष कायम रहायला हवे ;  सरसंघचालक मोहन भागवत भारत वर्षात सध्या जे घडतंय, ते केले जात नसून होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा सांगितले होते की, राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. शिवाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी सुद्धा आपल्या स्वयंसेवकांना सांगितले होते की, हे ईश्वरीय कार्य आहे. ते करत रहा. ‘श्रद्धा, भक्ती आणि समर्पण हे भारतवर्षाचे सद्भाग्य आहे. त्यानुसारच आज ही कार्य सुरू आहे.‌ यातच त्या कार्याचे यश असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले.
आळंदीत स्वामी गोविंददेव गिरी यांच्या अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त आयोजित गीताभक्ती अमृत महोत्सवाचा शुभारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.
             या प्रसंगी स्वामी गोविंददेव गिरी, जैन मुनी लोकेश महाराज, वारकरी शिक्षण संस्थेचे मारुती महाराज कुऱ्हेकर, खजिनदार भालचंद्र नलावडे, स्वामी राजेंद्रदास महाराज, बालयोगी सदानंद महाराज, अनुराग कृष्ण शास्त्री आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी लिहिलेल्या महाभारत या ग्रंथाचे प्रथम खंडाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.
           अयोध्येत उभारलेल्या श्रीराम मंदिराच्या माध्यमातून भारत वर्षचे काम सुरू झाले आहे. हा संयोग नसून नियतीची योजना आहे. भगवंताची कृपा आहे, सतत प्रयत्न करणे आपले काम आहे. श्रद्धा, भक्ती, समर्पण हे सर्वसामान्यां मध्ये सतत राहणारे गुण आहेत. म्हणूनच संत ज्ञानेश्वर महाराज यांनी विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागितले आहे. त्यामुळेच आमच्या पासून श्रद्धा, भक्ती, समर्पण विभक्त होऊ शकत नाही. कारण, कोणी झोपले तर त्याला जागवणारी ईश्वरी शक्ती आहे. त्या शक्तीची ईच्छाही अशी आहे की, कोणी राहो न राहो, भारतवर्ष रहायला हवे.”
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!