आपल्या संस्कृतीमध्ये दशक्रिया विधी हा तसा संस्काररुपी पुण्यकर्माचा विधी मानला जातो. माञ, अलीकडच्या काळात अनेक ठिकाणी दशक्रिया विधीत प्रवचन आणि काकस्पर्श झाल्यानंतर पाहायला मिळते ती श्रध्दांजलीच्या नावाखाली भाषणाची मांदियाळी ! खरं तरं मयत व्यक्तीच्या मागे त्याने केलेल्या कार्याचा उल्लेख होणे, समाजात त्यांच्या कार्याचा आदर्श निर्माण व्हावा, त्याच्या कुटुंबाबद्दल माहिती समाजाला मिळावी म्हणून त्या व्यक्तीविषयी आणि त्याच्या कुटुंबाविषयी थोडक्यात माहिती देणे अपेक्षित असते. परंतु काही मंडळींना यावेळीही परिस्थितीचे भान राहत नाही आणि त्यांची ही भाषणरूपी श्रध्दांजली या दु:खद प्रसंगात हास्यास्पद विषय ठरत आहे. सध्या हे चित्र सर्रासपणे पाहायला मिळत आहे.
कोणताही दशक्रिया विधी असला की दशक्रिया विधीला राजकीय नेत्यांची मोठी गर्दी होते. त्यातून भाषणबाजी एकमेकांची उणीदुनी, टीकाटिप्पणी याला ऊत आला आहे. त्यामुळे दशक्रिया विधी म्हटलं की ती राजकीय नेत्यांची सभास्थळे झालेत का हा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. दशक्रिया विधी कोणाचाही असला तर त्या कुटुंबाचे, मृत्यू झालेल्या व्यक्तीची माहिती देऊन सांत्वन करण्याऐवजी राजकीय नेत्यांची भाषणे लांबलचक, रटाळवाणी होत आहेत. परंतु उपस्थित असलेले लोक मात्र खाली बसून त्याची चक्क टवाळी करतात. खाली बसलेले वेगळ्याच गप्पा मारत असतात. असे वास्तव आहे. त्यामुळे सकाळचे दहा साडेदहा वाजले तरी दशक्रिया विधीचा कार्यक्रम उरकत नाही. काकस्पर्श होऊन गेला तरी भाषणबाजी सुरुच असते. काही प्रवनचनकार विनोद करतात आणि उपस्थितांना हसवण्याचा प्रयत्न करतात. प्रतिनिधी स्वरूपात एक दोन व्यक्तींनी श्रध्दांजली भाषण करणे योग्य आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे. समाजप्रबोधन होईल आणि त्यातून समाजाचं काही तरी हित साधले जाईल असे उपक्रम राबवावेत अशी चर्चा सध्या सुर धरुलागली आहे.