पुणे जिल्हा प्रतिनिधी
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे एका मंगल कार्यालयात वादळी वाऱ्याने स्टेज च्या पाठीमागील भिंत व संरक्षक भिंत कोसळून झालेल्या घटनेमध्ये वधू-वर व वधूचे वडील असे तिघे जण जखमी झाले आसल्याची घटना सोमवार दि.१३ रोजी सायंकाळी ६:४५ वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे.याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील एका मंगल कार्यालयात राजापूर ता.भोर जि.पुणे येथील खुटवड व कामथडी ता.भोर जि.पुणे येथील वाल्हेकर कुटुंबातील लग्न समारंभ आयोजित करण्यात आले होते. दरम्यान,सायंकाळी ६:४५ वाजण्याच्या सुमारास लग्नविधी उरकल्यानंतर मोठ्या प्रमाणात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहू लागलेले होते.
कार्यालयाशेजारी असणाऱ्या गार्डन मधील स्टेज च्या पाठीमागील बाजूस असणारी संरक्षक भिंत तसेच स्टेज च्या पाठीमागील भिंत व त्यावर लावण्यात आलेले स्टेज च्या भिंतीवरील कृत्रिम सजावट लग्न कार्या करीता करण्यात आलेली होती. तसेच लग्न समारंभ पार पडल्यानंतर छायाचित्र काढण्याकरिता व वधू-वरांना शुभेच्छा देण्याकरिता त्याठिकाणी नातेवाईकांनी गर्दी केली होती.
दरम्यान जोरदार वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे अचानकपणे स्टेजच्या पाठीमागील भिंत तसेच संरक्षक भिंत अचानकपणे कोसळत कृत्रिम सजावट वधू पायल रामदास खुटवड (वय २४ वर्ष रा.राजापूर ता.भोर जि.पुणे),वर प्रणव साहेबराव वाल्हेकर (वय २६ रा.कामथडी ता.भोर जि.पुणे) तसेच वधूचे वडील रामदास हरिभाऊ खुटवड (वय ५० वर्षे,रा.राजापूर ता.भोर जि.पुणे)यांच्या अंगावर कोसळली आहे.
अचानकपणे घडलेल्या घटनेमुळे लग्न समारंभामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.यावेळी जखमी झालेल्या पायल खुटवड, प्रणव वाल्हेकर,रामदास खुटवड यांना नातेवाईकांनी वाहना मधून तत्काळ शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केलेले आहे.यादरम्यान संबंधीतांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच तत्काळ शिरवळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय संकपाळ, शिरवळ रेस्क्यू टिम हे घटनास्थळी दाखल झाले.यावेळी रात्री उशीरापर्यंत शिरवळ पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.